शुक्रवार, 26 अगस्त 2011

धडे त्सुनामी व्यवस्थापनाचे

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११
हैद्राबादला पोहचलो तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. रात्रभर कोसळणार्‍या पावसाने सर्व रस्ते चिंब झाले होते. बाहेर गारवा जाणवत होता. समोरच्या जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विस्तीर्ण इमारतीकडे लक्ष गेलं. चहाची टपरी सुरु झाली होती. रिक्षावाला शोधतांना समोर बोर्ड दिसला. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (इनकोसीस)

भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाचा हा विभाग गेली १० वर्षे त्सुनामी संबंधीची माहिती अपडेट करतोय. त्याच इमारतीत एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तेथे सहभागी होता आले याचा आनंद होता. खरतर हा विषय एकदमच नवी न होता. कार्यशाळेत कोण असेल याचा अंदाज घेत सकाळी ९:०५ मिनीटांनी नोंदणीचे सोपस्कार आटोपले. पाठोपाठ रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांचा प्रवेश झाला. सेमिनार हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर जाणवलं की येथे वेगळंच काही होणार आहे.

एकमेकांचा परिचय झाला. भारतातल्या सागर किनार्‍यातील निवडक राज्यातील विविध क्षेत्रातील मोजकेच अधिकारी या कार्यशाळेसाठी बोलावण्यात आले होते. भारतीय त्सुनामी तात्काळ सूचना प्रणाली संबंधी माहिती संचालक डॉ.टी. श्रीनिवास कुमार यांनी दिली. वीस वर्षापूर्वी त्सूनामी या विषयी केवळ एक परिच्छेद अभ्यासक्रमात होता आज स्वतंत्र शाखा झाल्याचे सांगतांना त्यांच्याकडे असणार्‍या ज्ञानाचे भांडार शब्दा शब्दात जाणवत होते. त्सुनामी येण्याची पूर्व कल्पना शास्त्रशुध्द पध्दतीने जगभरातून तात्काळ मिळविता येते आणि त्या माहितीचा उपयोगही होऊ शकतो.

त्सुनामी विषयी जनजागृती आणि त्याची पूर्व तयारी या विषयीची माहिती पंतजली कुमार यांनी दिली. ए.के. शर्मा यांनी अंदमान निकोबार मधील त्सुनामी संबंधी केलेल्या उपाययोजना विस्तृत स्वरुपात सांगितल्या. श्रीमती एम.व्ही. सुनंदा यांनी त्सुनामी संबंधीची सूचना कशी वाचली जावी, त्याचे अर्थ आणि उपाययोजना या विषयी अवगत केले. डॉ.उमा देवी, बी. अजय कुमार यांच्या टेबलटॉप एक्सरसाईज ने सार्‍यांना वेगळ्या विश्वात नेऊन ठेवले आणि त्सुनामी आल्याचा भास देऊन गेलं. समारोप मस्त वाफाळलेल्या चहा सोबत हैद्राबादी बिस्कीटांनी झाला. माझ्या मनात मात्र सिंधुदुर्गचा समुद्र दिसत होता. खरच त्सुनामी आली तर काय होईल ? आपली तयारी आहे का? या विचारात सोबत असलेली माहिती पत्रकं चाळू लागलो.

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात विविध सेवा दिल्या जातात. समुद्राचे राष्ट्रीय विकासातील महत्व लक्षात घेता या संबंधी अधिक संशोधन गरजेचे मानून या संस्थेमार्फत विविध कार्यक्रम हाती घेतले जातात. सागराशी संबंधीत सर्व घटकांना, उद्योगांना, शासनाला आणि शास्त्रज्ञांना पध्दतशीर व सुकेंद्रित संशोधनाद्वारे, सागरी निरीक्षणांद्वारे अचूक माहिती व सल्ला या केंद्रामार्फत दिला जातो. भारतातील समुद्रकिनार्‍यावरील २०० केंद्रामधून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार मासेमारीचे स्थळं कोणती याचे मार्गदर्शन केले जाते. हे मार्गदर्शन जून ते सप्टेंबर या महिन्यात दिले जात नाही.

त्सुनामी म्हणजे पृथ्वीवर होणारी नैसर्गिक आपत्ती होय. समुद्रातील भुकंप असाही उल्लेख केला जातो. त्सुनामी आल्यानंतर लाटांची उंची वाढते. त्यामुळे किनार्‍यापासून दूर जाणे हा एकमेव पर्याय झाला आहे. त्सुनामी येण्याची सूचना प्राप्त झाल्यानंतर तात्काळ समुद्रातून बाहेर पडणे आवश्यक आहे. किनार्‍यापासून दूरवर उंच ठिकाणी जाऊन उभे राहीले पाहीजे. त्सुनामी ओळखता येते. प्रथम जमिनीत कंप निर्माण होतात. समुद्रातील पाण्यात लाटांमध्ये बदल दिसू लागतात. हवेचा आवाज देखील मोठय़ाने येऊ लागतो. मच्छीमारांसाठी त्सुनामी हे मोठे संकट आहे. अशा वेळी तात्काळ किनार्‍याकडे येणे खूपच आवश्यक आहे. बोटीवर संपर्क यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.

हैद्राबादमधील केंद्रातून तात्काळ माहिती संपूर्ण भारतात दिली जाते. त्या माहितीच्या आधारे जिवीत हानी टाळता येऊ शकते. २६ डिसेंबर २००४ ला भारतीय समुद्रात त्सुनामी आली होती. ४३ बिलीयन डॉलरचे नुकसान त्यामुळे झाले. भारतीय समुद्रतटावर जेथे त्सुनामीची शक्यता आहे असे क्षेत्र निवडण्यात आली असून तेथे अत्यंत काळजीपूर्वक निरीक्षणे नोंदविली जातात. जवळपास १७ ब्रॉडबॅन्ड अतिसंवेदनशील सेन्सर काम करतात. ७ ठिकाणी समुद्राच्या तळात घडणार्‍या बदलांची माहिती नोंदविली जाते.

त्सुनामी नोंदविण्यासाठी ३६ स्वयंचलीत केंद्रे समुद्रात २४ तास काम करतात. यासाठी पृथ्वीविज्ञान मंत्रालय, अवकाश विभाग यासह गृहविभागा सोबतच अन्य विभागाच्या समन्वयाने त्सुनामी संबंधी अद्यावत माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय भारत हा असा एकमेव देश आहे की, ज्या देशाने त्सुनामी माहिती विषयक केंद्र स्थापन केलं आहे. ११ मार्च २०११ ला जपानमध्ये झालेल्या त्सुनामीनंतर सार्‍या जगाला या विषयी चिंता वाटते आहे. भारतात असे काही झाले तर तयारी असावी यासाठी कार्यशाळांचे आयोजन करता येते. त्सुनामी येण्याअगोदर आणि नंतर करावयाच्या कामांसाठी अशा पध्दतीची कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरत असते.

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत काम करतांना अशा प्रशिक्षणाची संधी मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण कोणत्याही नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी माहिती होणे आणि आपत्ती आल्यानंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी मनाची तयारी होणे हे केवळ शास्त्रशुध्द प्रशिक्षणामुळेच शक्य होते. हैद्राबादमधील (इन्कोसीस) भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र आणि चारमिनारच्या भेटीसह कायमचे लक्षात राहील, असा विचार असतांनाच समोर बस आली आणि परतीचा प्रवास सुरु झाला होता. उद्या पुन्हा सिंधुदुर्गच्या समुद्र किनार्‍यावर जाऊन काम काय करणे आवश्यक आहे याची यादी सुरु होती.

  • डॉ. ग. व. मुळे

  • चक्रीवादळात घ्यावयाची काळजी

    महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याजवळील भागातील अधिकारी,मच्छीमार व इतर लोकांनी चक्रीवादळ येण्यापूर्वी व येऊन गेल्यावर करावयाच्या उपाययोजना माहितीसाठी पुढे दिल्या आहेत. हवामान खात्याकडून चक्रीवादळाच्या धोक्यासंबंधीचा इशारा दोन टप्प्यांमध्ये देण्यात येतो.

    चक्रीवादळापूर्वी दक्षतेचा इशारा हा पहिला धोक्याचा इशारा किनाऱ्यालगतच्या भागात प्रतिकूल हवामान सुरु होण्याच्या ४८ तास अगोदर देण्यात येतो.

    चक्रीवादळाचा इशारा हा २४ तास अगोदर देण्यात येतो. या इशाऱ्या संबंधीचा माहिती स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत संबंधित भागातील लोकांपर्यत तसेच त्या भागातील मच्छिमारांपर्यत पोहोचविण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणेचा उपयोग करण्याबद्दल आवश्यक त्या सूचना महसूल, पोलीस व बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना शासनाने दिल्या आहेत. चक्रीवादळासंबंधीच्या धोक्याचे इशारे आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन दर एक तासांनी देण्याची व्यवस्था करण्यात येते.

    चक्रीवादळाचा मोसम सुरु होण्यापूर्वी घरांची तपासणी करावी, निखळलेली कौले शक्यतो सिमेंटने पक्की करावीत.आवश्यक असेल तर खिडक्या-दारांची दुरुस्ती करावी. घरावर घातलेले पत्रे पक्के बसवावेत.

    घराच्या आजूबाजूच्या जागेची तपासणी करावी, मेलेली किंवा वठलेली झाडे पाडून टाकावी. उभ्या करुन ठेवलल्या लाकडाच्या फळ्या ,ॲसबेस्टॉस, सिमेंट किंवा टिनचे पत्रे,भिंतीच्या सैल झालेल्या विटा, पत्र्याच्या हलक्या कचरापेट्या, ढिले नामफलक किंवा जाहिरातीचे फलक इत्यादी जोराच्या वाऱ्याने उडून जाणाऱ्या वस्त काढून टाकाव्यात किंवा व्यवस्थित बांधून ठेवाव्यात.

    काही लाकडी तावदाने तयार ठेवावीत म्हणजे ती काचेच्या खिडक्यांना ठोकता येतील.रॉकेल भरुन कंदील तयार ठेवावेत. तसेच वीज गेल्यास उपयोगी पडावा म्हणून फ्लॅश लाईट (बॅटरी) तयार असावा. पुरेसे ड्राय सेल्स जवळ असावेत.

    निकामी, पडझड झालेली, कच्ची बांधकामे पाडून टाकावीत.ज्यांच्याकडे रेडिओ आहेत त्यांनी ते व्यवस्थित चालतात याची खात्री करुन घ्यावी. ठ्रन्झिस्टरच्या बाबतीत बॅटरीचा आणखी एखादा संच हताशी ठेवावा.

    वादळाचा इशारा देण्यात आलेल्या भागात करावयाच्या उपाययोजना 

    आपले रेडिओ, टीव्ही चालू ठेवावेत आणि हवामानाविषयक ताज्या इशाऱ्याकडे लक्ष द्यावे. अगदी नजीकच्या आकाशवाणी केंद्राकडून मिळाणारा सल्ला लक्षात घ्यावा व त्यासंबंधी माहिती इतरांनाही द्यावी.

    अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त रेडिओ, टिव्हीद्वारे अथवा इतर मार्गानी मिळालेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा व ती इतरांना द्या.

    भरती किंवा वादळी लाटांचा उपसर्ग पोचेल अशा स्थानांपासून दूर रहा. सुरक्षित ठिकाणी जाण्याचा मार्ग पाण्याने भरुन जाण्याच्या आधीच तेथे पोचण्याची खबरदारी घ्या व पाण्याने वेढले जाण्याचा धोका टाळा.

    जर तुमचे घर भरती किंवा नदीच्या पुराच्या धोक्यापासून सुरक्षित असेल व ते पक्क्या बांधणीचे असेल तर वादळाचे संकट पार करण्याचे ते बहुधा योग्य ठिकाण ठरेल. तथापि, ते रिकामे करण्यात सांगितल्यास तत्परतेने रिकामे करा.

    मुसळधार पावसामुळे ज्या भागातील नाले किंवा नद्यांना पूर येतील अशा भागात घरामध्ये पाणी शिरण्याच्या धोक्यापासून सावध रहा.काचेच्या खिडक्यांना लाकडी फळ्या ठोका किंवा मजबूत शटर्स बसवा. घट्ट बसणाऱ्या फळ्यांचा वापर करा. कामचलाऊ फळ्या लावल्यास अजिबात फळ्या न लावण्यापेक्षाही अधिक नुकसान होऊ शकते. बाहेरच्या दरवाज्यांना मजबूत टेकू द्या.

    तुमच्याकडे सुटसुटीत लाकडी फळ्या नसतील तर घरामध्ये काचा शिरु नयेत म्हणून खिडक्या-दारांच्या काचांना कागद चिटकवा.घरामध्ये न शिजवता किंवा अगदी थोड्या तयारीनिशी तयार करता येतीलअसे अन्नपदार्थ तयार ठेवा.नीट झाकता येईल अशा भांड्यामध्ये पुरेसे पिण्याचे पाणी ठेवा.

    चक्रीवादळामुळे घर सोडावे लागेल अशा भागात आपण रहात असाल तर पाण्याने खराब होऊ शकणाऱ्या वस्तूंचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून त्या वरच्या मजल्यावर नेऊन ठेवा.

    हरिकेन कंदील, फ्लॅश लाईट किंवा आणीबाणीचे दिवे (इमर्जन्सी लाईटस्) चालू स्थितीत असू द्या आणि ते हाताशी तयार ठेवा. ज्या वस्तू पाण्यात वाहून जाण्यासारख्या किंवा फाटण्यासारख्या असतील त्यावर लक्ष ठेवा. घासलेअचे डबे,कॅन्स, शेतीची अवजारे, बागेतील हत्यारे, रस्त्यावरील संकेत चिन्हे आणि तत्सम इतर वस्तू वादळी वाऱ्यात विध्वंसक शस्त्रासारख्या ठरतात म्हणून त्या बंद खोलीत ठेवा.

    वाऱ्याच्या दिशेच्या विरुध्द बाजूला असलेला घराचा दरवाजा किंवा खिडकी उघडू शकेल याची आधीच खात्री करुन घ्या. मुलांना व वृध्दांना लागणाऱ्या विशेष आहाराची व्यवस्था ठेवा.

    वादळाचे केंद्र तुमच्या घराजवळ असण्याची किंवा वादळ तुमच्या घरावरुन जाण्याची शक्यता असेल तर अशा वेळी सुरक्षित जागी रहा. वाऱ्यांचा वेग कमी असण्याच्या काळात आवश्यक त्या निकडीच्या दुरुस्त्या करुन घ्या. परंतु विरुध्द दिशेने जोराचा वारा येण्याची व त्याचा वेग जास्त असण्याची शक्यता लक्षात असू द्या.
    गोंधळून जाऊ नका, तुम्ही संकटाला धैर्याने तोंड देण्याची तयारी दर्शविली तर त्यामुळे इतरांनाही स्फूरण येईल व मदत होईल.

    चक्रीवादळ येऊन गेल्यावर तुटलेल्या विजेच्या तारांपासून दूर रहा. वीज प्रवाह चालू असलेल्या तारेस चिकटलेल्या एखद्या व्यक्तीची सुटका करण्यासाठी ती तार करण्याकरिता कोरड्या काठीसारख्या बंद वीज वाहकाचा वापर केला पाहिजे. तुटलेल्या तारांविषयीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना लवकर द्या.

    जेथे झाडे आणि फांद्या पडण्याच्या अवस्थेत असतील , इमारती आणि पूल कोसळण्याचा संभव असेल तेथे चालताना आणि वाहने चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे. चक्रीवादळावर साथीचे रोग उद्भवण्याची धास्ती असते अशा रोगापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या.

    मदत कार्य करणाऱ्या लोकांखेरीज इतरांनी धोक्याच्या ठिकाणापासून दूर रहावे.